शेवगाव – तालुक्यात यावर्षीच्या कापुस हंगामास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कापुस विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा फायदा होवून त्यांच्या मालास चांगला भाव मिळेल. यासाठी सी.सी.आयचे कापुस खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी शाखा प्रबंधक सी.सी.आय औरंगाबाद यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने समितीचे सभापती ऍड. अनिल मडके यांनी केली आहे.
कमी अधिक पावसामुळे कापसाचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. कुठे कुठे थोडा कापूस निघतो आहे. खासगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी केंद्र सुरु केली आहेत. शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्या कापसाची आवक होत आहे. मात्र त्याला मिळणारा भाव हा हमीभावापेक्षा खुप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवून ते सर्व बाजूने संकटात सापडले आहेत.
सी.सी.आयचे कापुस खेरदी केंद्र सुरु झाल्यास शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांच्या मालास चांगला भाव मिळेल व बाजारपेठेत भाव टिकुन राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर केंद्र सुरु करावे. शेवगाव तालुक्यात माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने कायम शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.