आवक वाढल्यानंतर दर घसरण्याची शक्यता
पिंपरी – परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यासमोर सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारात होणारी आवकही मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे धान्य, कडधान्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वी आणि आताच्या धान्यांच्या दरात सरासरी 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे अगोदरच नुकसान सोसावे लागले असतानाच आता जीवनावश्यक धान्य व डाळींची दरवाढ नागरिकांना सहन करावी लागत आहे.
यावर्षी राज्याच्या विविध भागात पावसाचा असमतोल पहायला मिळाला. मराठवाडा, विदर्भात पावसाने सुरुवातीच्या काळात दांडी मारली तर अर्ध्या पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी, बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धनधान्य चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र समाधानकारक पावसानंतरही परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोयाबीन, उडीद यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारपेठेतील गणितेही बिघडली असल्याचे दिसत आहे. अनेकजण वर्षात एकदा अथवा सहा महिन्यातून एकदा धान्याचा साठा करुन ठेवत असतात. मात्र, धान्य बाजाराचे गणित पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे, सध्या धान्य बाजारावर परतीच्या पावसाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांत ज्वारी, बाजरी, गहू यांच्या दरामध्ये चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे या धान्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांची भाकरी देखील मोठ्या प्रमाणात महागली आहे. दरवर्षी दिवाळीनंतर काही प्रमाणात नवीन धान्यांची आवक सुरु होते; यंदा मात्र अतिवृष्टीमुळे धान्य काळे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने नवीन धान्य बाजारात कमी प्रमाणात येत आहे.
यंदा ज्वारीची आवकही मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे, ज्वारीचा दर 40 रुपयांपर्यत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर प्रामुख्याने तांदळाची आवक चांगल्या प्रमाणात होते व दरही आवाक्यात येतो. मात्र, यावर्षी भातशेतीला पावसाचा मोठा फटका बसल्याने तांदळाच्या आवकेवर मोठा परिणाम होणार आहे. परिणामी धान्य, कडधान्यांच्या दरातील वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने, ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
यंदा अति पावसामुळे धान्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात आवक घटण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीनंतर काही प्रमाणात धान्याचे दर आवक्यात येत असतात. मात्र, यावर्षी दिवाळीपूर्वीच दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीला धान्याची आवक वाढली तरच दर आवाक्यात राहणार आहेत.
– कन्हैया ओझा, व्यापारी, पिंपरी
परराज्यातील डाळींच्या आवकवरही परिणाम
पुणे, पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत प्रमुाख्याने बाहेरच्या राज्यातून डाळी मोठ्या प्रमाणात येतात. यामध्ये मूग, मटकी, उडीद, अख्खा मसूर यांची आवक बाहेर राज्यातून तर हरभरा, तूरडाळ यांची आवक मराठवाड्यातून होत असते. मात्र, यावर्षी सर्वत्र पावसाचा फटका बसल्याने या डाळींच्या आवकेवर परिणाम होणार आहे. सध्या समाधानकारक आवक असली तरी लवकरच त्यात घट होईल असे व्यापारी सांगत आहेत.