कबीर बोबडे
नगर – आज 5 नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन. विष्णूदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचे समरण ठेवून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केल्या जातो. मराठी रंगभूमी निमित्त अभिनेत्री किरण खोजे यांच्याशी केलेला हा संवाद –
तुम्ही नाटकाकडे कशा वळलात ?
– मला लहानपणापासून नाटकाची आवड आहे. शाळेत असतांना मी नाटकात काम करायची. वेगवेगळ्या स्पर्धात भाग घ्यायची. गणपती उत्सवात नाटकात काम करायची. तेव्हापासूनच माझा नाटकाकडे कल वाढला. शिवाय, आमच्या घरात देखील कलासक्त लोक होते. म्हणजे, माझी आई मला कायम वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायची. तिने खूप गोष्टी मला शिकवल्या. ओव्या शिकवल्या. जनाबाई समजून सांगितल्या. मी नववीत असतांना राज्य नाट्य स्पर्धेत काम केलं. तिथून माझा खऱ्या अर्थाने नाट्यप्रवास सुरु झाला. बक्षीस मिळाली. मग ते करतांना मजा यायची. त्याच दरम्यान एन.एस डी. विषयी कळलं. शिवाय, तेव्हाच अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, प्रसाद वनारसे हे नगरला आले होते. तेव्हा गीतांजली ताईंशी संवाद झाला. त्यांनी एन.एस.डी. विषयी सांगितलं. मग एन. एस. डी. ची तयारी केली. तिथे तीन वर्षे शिकले. त्यानंतर व्यावसायिक अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुरु झाला.
एन.एस. डी. ला जाण्यापुर्वी कुठली नाटके केली ?
– काही एकांकिका, पथनाट्य केली. धनंजय सरदेशपांडे यांचं ‘सरपण’ केलं. चितळे यांचं ‘मृत्यूछाया’ केलं. श्री. ना. पेंडसेचं ‘डॉ. हुद्दार’केलं. ‘हातचा एक’ हे एक नाटक केलं.
तुम्ही एन.एस. डी. केलं. मात्र, बरेच कलावंतांनी नाट्य शिक्षण न घेता चांगलं काम केलं.
नाट्य शिक्षण घेणे गरजेचे आहे का ?
– मी नाट्य शिक्षण घेण्याआधी देखील नाटक करायची. पण, शिक्षण घेतल्यानंतर मला बरेच बारकावे कळले. एखादी भूमिका करतांना खोलात जाऊन विचार करायला शिकले. आता माझ्याकडून नाटक अभ्यासपूर्ण बघितल्या जाते. चिकित्सकदृष्टीने नाटक बघायला शिकले. हे सगळं नाट्य शिक्षण पूर्ण केल्यानंतरचे बदल आहेत. जे कलावंत नाट्य शिक्षण न घेता चांगलं काम करतात, त्यांच्या विषयी असं आहे की, त्यांनी भलेही औपचारिक नाट्य शिक्षणाचे धडे घेतले नसतील. मात्र, अनौपचारिक पद्धधतीने त्यांनी स्वतःला घडवलेले असतं. त्यांचं वाचन चांगलं असतं. अभ्यास केलेला असतो. त्यांचा नाटकाचा – कलेचा अभ्यास चांगला असतो. ते कलावंत नवे बदल देखील समजून घेतात. पण, ज्याचं वाचन होत नाही, स्वतः स्वतःला वेळ देता येत नसेल अशा लोकांनी औपचारिक शिक्षण घेतलं पाहिजे. कारण, तिथे हे सगळं करायला मिळतं. करून घेतल्या जातं.
नगर सारख्या निमशहरी गावात नाटक होतं. मात्र, तरुण कलाकारांचा सिनेमाकडे कल आहे. नाटकाविषयी उदासीनता दिसून येते..
– मला वाटतं, ही उदासीनता नाही. टीव्ही सीरिअल, सिनेमा ही दुसरी माध्यम आहेत. बरेच जण आधी नाटक करतात. त्यांज नाटकात काम केलेले असते. आणि मग नवीन माध्यम देखील शिकतात. उलट आपल्याला नवीन मुलांचा अभिमान वाटायला हवा. कारण, नवीन मुलं नाटका सोबतच इतर गोष्टी देखील शिकतात. आज नगरमध्ये वेब सिरीज बनते. फिल्म प्रोड्युस होतात. त्यामुळे ही उदासिनता आहे, असं नाही. उलट आपण नवीन मुलांचं कौतुक करायला हवं. शिवाय, अभिनय हा अभिनय आहे. तुम्ही अभिनय कोठेही करा. फक्त आपल्या समोरची माध्यम बदलतात. शेवटी, कलावंत म्हणून मेहनत तितकीच करावी लागते.
नगरमध्ये नाट्य कलावंत आहेत, मात्र, नाट्य चळवळ नाही
– मला असं वाटतं, नाट्य कलावंत.. नाट्य कलावंत किंवा नाट्य चळवळ.. नाट्य चळवळ असं म्हटल्यापेक्षा कलावंत आणि चळवळ असं म्हणूया. दुसरं असं, एखादी नाट्य चळवळ नसेलही, नगरमध्ये. मात्र, ती एखादी चळवळ म्हणजे, पूर्ण नाट्य चळवळ नाही. हे अस झालं की, पुण्यात ललित आहे, पण एन. एस. डी. नाही.. मला वाटतं, नाट्य चळवळ नसू देत, पण नगरमध्ये नाटक होतं. अनेक स्पर्धा होतात. अनेक नाट्य संस्था आहेत. त्यातून नवे कलावंत पुढे येतात. अजून कुठली नाट्य चळवळ हवीय… आपण कधीकधी प्रोत्साह देणारं देखील बोललं पाहिजे.. आता नगर मध्ये इप्टा नाही, पण नाटक होतंच ना, नगरमध्ये.
नाट्य क्षेत्रात काम करणारी अनेक महत्वाची नाट्य कलावंत वैचारिक भूमिका घेतात.. कलावंतांनी वैचारिक भूमिका घेतली पाहिजे का ?
– वैचारिक भूमिका घेतात म्हणजे, काय करतात, मला कळलं नाही..
वैचारिक भूमिका घेतात, म्हणजे ते सामाजिक प्रश्नांवर बोलतात
– तुम्ही पत्रकार आहात. त्याआधी तुम्ही नागरिक आहात. मग तुम्हाला असं वाटतं का, नागरिक म्हणून आपली एखाद्या प्रश्नासंदर्भात एखादी वैचारिक भूमिका असावी का ?
हो, वाटतं
– मग आज अतुल पेठे, नसिरुद्दीन शाह ही लोक भूमिका घेतात, ते माणूस म्हणून भूमिका घेतात. ते नाट्य कलावंत आहेत म्हणून भूमिका घेत नाहीत. ते त्यांच्या कलेतून भूमिका घेतात. त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम नाटक आहे, ते नाटकातून भूमिका घेतात. मला वाटतं, कुठलीही वैचारिक भूमिका केवळ कलावंतांनीच घेतली पाहिजे, असं नाही. माणूस म्हणून प्रत्येकाने वैचारिक भूमिका घेतली पाहिजे. केवळ कलावंतांनीच भूमिका घेतली पाहिजे, असं नाही..
मराठी रंगभूमी दोन विभागात विभागल्या गेली. व्यावसायिक आणि समांतर. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत की, विरोधक?
– पूरकच आहेत, विरोधक कसे असतील. बरेच व्यावसायिक नट हे समांतर रंगभूमीवर देखील काम करतात.
ग्रामीण रंगभूमी धूसर होत चाललीय का ?
-नाही, मला नाही वाटतं. आणि किती दिवस तेच ते करायचं. अनेक जण शहरात येऊन काहीतरी करू पाहतात. ते चांगलंच आहे. सगळीकडे प्रगती होत असेल, प्रत्येकजण नव्या वाटा चोखाळत असेल, तर ग्रामीण रंगभूमीवर काम करणाऱ्यांनी इतर ठिकाणी देखील काम केलं तर काय हरकत आहे.
नवीन कलावंतासाठी काय सांगाल,
खूप वाचा. आजूबाजूची परिस्थिती बघा. सामाजिक, राजकीय निरक्षण करा. भोवतालचा अभ्यास करा. यातून नव्या गोष्टी कळत जातील. यातून नव्या संहिता सुचतील.