प्रवाशांना नाहक मनस्ताप : एका महिन्यात सरासरी 4 बसेस पडतात बंद
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) वातानुकूलित शिवशाही बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे. शहरालगत असलेल्या कात्रज घाटात अनेकदा शिवशाही बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागात एका महिन्यात शिवशाहीच्या सरासरी 4 बसेस बंद पडत असून आठवड्याला 1 बस बंद पडत आहे. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास सरासरी 24 शिवशाही बस ब्रेकडाऊन झाल्या असून ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. एकीकडे साध्या (लाल) व निमआराम (हिरकणी) बस कमी करून महामंडळ शिवशाही बस प्रवाशांच्या माथी मारत असतानाच शिवशाही बस रस्त्यातच बंद पडत असल्याने त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शिवशाही मोठा गाजावाजा करत एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. मात्र, सतत ब्रेकडाऊन व अपघातांच्या घटनांमुळे शिवशाहीची प्रवासी संख्या घटत आहे.
ठोस उपाययोजना करण्याची गरज
पुणे विभागातून बारामती, महाबळेश्वर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज येथे जाणाऱ्या शिवशाही बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या 15 दिवसांपूर्वी कात्रज घाटात शिवशाहीला आग लागल्याची घटना घडली होती. इंजिनमधून धूर, टायर फुटणे, इंजिन गरम होणे, गाडी पिकअप न घेणे आदी प्रकारांमुळे शिवशाही बस प्रामुख्याने बंद पडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवशाहीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.