आमदार झाल्यानंतर थेट बांधावरच…
विधानसभेत विजयी झाल्यानंतर आ. बबनराव पाचपुते प्रथमच तालुक्यात आले होते. निकाल लागल्यानंतर दिवाळी व नंतर मुंबईत काही दिवस गेले. मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी थेट नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
श्रीगोंदा – अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वतः उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली.
कांदा, द्राक्ष, डाळिंब, तूर, मका, सोयाबीन, कापूस आदींचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यास कर्मचारी कमी पडल्यास इतर विभागांतील कर्मचारी देखील या कामात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात 28 हजार 685 हेक्कटर बाधित झाल्याचे समजते. या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, सभापती शाहजी हिरवे, विठ्ठलराव काकडे, शंकर कोठारे, बाळासाहेब महाडिक, संतोष लगड, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते.