आमदार शशिकांत शिंदे : प्रचार सभेच्या प्रसंगी मतदारांशी साधला संवाद
सातारा – जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता शिवसेना उद्या अन्य कोठे जाणाऱ्या दलबदलूंची अवस्था फिरत्या रंगमंचाप्रमाणे झाली आहे, अशा दलबदलूंना जनता जागा दाखवून देईल, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव खटाव तालुक्यात प्रचार सभेच्या प्रसंगी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, “स्वार्थासाठी पक्ष बदलणारे लोकांना वेठीस धरत असून जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने संधी दिली, त्यावेळी किती सभेला ते हजर होते असा प्रश्न मतदार आज विचारत असून केवळ स्वार्थापोटी मतदारांना वेठीला धरून पक्षनिष्ठा वेशीला टांगणाऱ्या या दलबदलूंना कोरेगाव मतदारसंघातून कायमचे हद्दपार करण्यासाठी मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.
सत्ता नसतानाही विकास कामाचा झंजावात कायम ठेवत राज्याच्या कानाकोपऱ्यात कोरेगाव मतदारसंघाचे नाव आघाडीवर ठेवण्यात मी सर्वांच्या साक्षीने यशस्वी झालो आहे.’ मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा शरद पवारांचे निष्ठावंत पाईक या मतदारसंघात इतिहास घडवतील, असा विश्वास व्यक्त करून शिंदे म्हणाले, “”आश्वासनांची खैरात करीत भाजप-शिवसेना पक्षाने मतदारांच्या विश्वासाला तडा दिला आहे.
बेरोजगारी, महागाई यासारख्या ज्वलंत प्रश्नाने आज सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळेच मतदारांमधून शिवसेना- भाजपबद्दल चीड आहे. गेल्या पाच वर्षात सत्ता नसताना देखील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी आणून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.” युती सरकारने शेतकऱ्यांसाठी फसवी कर्जयोजना राबवली. आजही हजारो शेतकरी कर्जापायी आत्महत्या करीत असून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले आहे.
शेकडो कंपन्या बंद झाल्याने बेरोजगारी वाढली, गोरगरीब जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम युती सरकारने गेल्या पाच वर्षात केला आहे, अशी टीका त्यांनी केली. इतर पक्षांतील लोक ओढून पक्षवाढीची भाषा करणाऱ्या युतीचा फुगा या निवडणुकीत फुटणार आह, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी आसगाव, भीमनगर, जळगाव, मंगळापूर, शिरढोण, गोगावलेवाडी, कठापूर, दरूज, निढळ, नागनाथवाडी, नेर, खातगूण या गावांना भेटी दिल्या.