कन्नड: नागालॅंड, मेघालय, अरूणाचल, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये जमीन घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, त्याचं काय ? खरंतर देशात कलम ३७० किंवा ३७१ यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान, त्यांनी कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, पाकिस्तानशी दुसरं युद्ध झालं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी भारतीय सैन्याने आपलं शौर्य दाखवून यश मिळवलं. मात्र इंदिरा गांधींनी कधी हे मी केलं, अशी प्रसिद्धी केली नाही. इंदिराजींनी कधी श्रेय घेतलं नाही पण आजचे पंतप्रधान श्रेय घेतात. लोकसभा निवडणुकीआधी देशात अतिरेकी कारवाया झाल्या तेव्हा या दहशतवादी कारवायांना आळा बसावा यासाठी देशातील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आणि लष्कराने कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. मात्र आजचे गृहमंत्री सांगतात, की आम्ही ५६ इंचाच्या छातीने हे सर्व करून आणलं.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मिरची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्या अधिकाराला संरक्षण देण्यासाठी घटनेत ३७० चे कलम आणण्यात आले. आता कलम ३७० हटवल्याने आपण तिथली जमीन खरेदी करू शकतो, हाच बदल झाला आहे. मात्र याचा गाजावाजा आजचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे पवार म्हणाले.
मी पंतप्रधानांना नम्रपणे सांगू इच्छितो की, पंतप्रधान हे पद देशाच्या इभ्रतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होऊ देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहील अशी पावले टाकली पाहिजेत, असेही पवार म्हणाले.