स्टार प्रचारकांच्या सभांना फटका बसण्याची भीती
सातारा – सातारा शहरासह जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर पाणी पडत आहे. त्यामुळे उमेदवारांची पंचाईत होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अशा स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यात जिल्ह्यात होणार आहेत. त्यांच्या सभांना पावसाचा फटका बसण्याची भीती राजकीय पक्षांना वाटत आहे.
साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून निर्णायक टप्प्यातील प्रचार सभा अडचणीत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सभांसह अन्य 11 सभांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. अगोदरच प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असताना पावसाने जोर धरल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचणे मुश्कील झाले आहे. कोपरा सभा, पदयात्रांसाठी कार्यकर्ते जमवताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
पावसामुळे कार्यकर्ते घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे प्रचाराचा बट्ट्याबोळ होत आहे.दसऱ्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला गती आल्याने पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभांमुळे नेत्यांचे शेड्युल बिझी झाले आहे. प्रचारासाठी नेत्यांना वेळ कमी पडत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. स्टार प्रचारकांच्या सभांची जोरदार तयारी सुरू आहे.
प्रचार शिगेला पोहोचला असताना मुसळधार पावसाने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दाणादाण उडवली आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यात आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आदर्श आचारसंहितेनुसार जाहीर प्रचारासाठी रात्री 10 वाजेपर्यंतचीच वेळ आहे. सकाळी पदयात्रा, त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पुन्हा मतदारांशी संपर्क व सायंकाळी कोपरा सभा, असा उमेदवारांचा भरगच्च कार्यक्रम आहे.
या नियोजनावर पाऊस पाणी फिरवित असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा हिरमोड होत आहे. पावसामुळे मतदारही घराबाहेर पडत नसल्याने प्रचार सभांसाठी गर्दी गोळा करताना कार्यकर्त्यांना घाम फुटत आहे. पावसामुळे जाहीर सभांची नियोजित ठिकाणे बदलण्याची अथवा सभा रद्द करण्याची वेळ नेत्यांवर येत आहे. आता तरी पाऊस थांबावा, असे साकडे राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार व त्यांचे समर्थकांचे घालत आहेत.