2009 पासून उमेदवारांच्या संख्येत घट
मुंबई (प्रतिनिधी) – आर्थिक मंदीचे वातावरण, निवडणूक लढण्यासाठी येणारा खर्च, निवडणूक व्यवस्थापन यंत्रणा तसेच कार्यकर्त्यांचा अभाव, मतदान यंत्राबाबतची साशंकता आणि निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे अनेक हौशी उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
त्यामुळे गेल्या 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणूकीत उमेदवारांची संख्या रोडावली आहे. यंदाच्या निवडणूकीच्या मैदानात 3 हजार 239 उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि युती झाल्याने उमेदवारांची संख्या घटली आहे. निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्रित 288 उमेदवार उभे केले आहेत. तर या निवडणुकीत कॉंग्रेसने 146 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 117 उमेदवार उतरवले आहेत. वंचित बहुजन आघाडीने 250 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 150 च्या आसपास जागा लढवत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबरला संपली. या मुदतीत 1 हजार 504 उमदेवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. माघारीनंतर निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून 288 जागांसाठी 3 हजार 239 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या 880 ने कमी झाली आहे.
चौदाव्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच यंदाच्या निवडणूकीच्या मैदानात 3 हजार 239 उमेदवार उतरले आहेत. तर पाच वर्षापूर्वीं म्हणजे 2014मध्ये 4 हजार 119 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
गेल्या चार निवडणुकीतील उमेदवारांची संख्या
1999……………….2006
2004………………..2678
2009………………3559
2014………………4119