राजगुरूनगर (प्रतिनिधी): आजी माजी आमदारांच्या हेकेखोरपणाला तालुक्यातील जनता कंटाळली आहे. जनता आजवर सक्षम पर्यायांच्या शोधात होती. तो शोध आता संपला असून अतुल देशमुख यांच्या रूपाने शेतकरी कुटुंबातील तरुण तालुक्याचे नेतृत्व करायला पुढे आला आहे. बळीराजाच्या या मुलाला साथ द्या असे, आवाहन जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी केले आहे.
खेडच्या पूर्व भागात कनेरसर, वाफगाव वरुडे परिसरात अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कनेरसर ता खेड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बुट्टेपाटील पुढे म्हणाले की, चालू पंचवार्षिक काळात विद्यमान आमदारांची निष्क्रियता आणि त्यापूर्वीच्या दहा वर्षांत माजी आमदारांची दादागिरी जनता विसरली नाही.
यावेळी अमोल पवार म्हणाले की, आजी-माजी आमदारांच्या ठेकेदारीच्या वादात आम्हाला पडायचे नाही. परंतु तालुक्यात आलेल्या एमआयडीसीत आणि एसईझेड मध्ये यांची ठेकेदारी असून त्यात स्थानिकांना नोकऱ्या फक्त वॉचमन म्हणून नोकऱ्या दिल्या आहेत. आजवर या दोघांच्या गटातटाने तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून तालुका वीस वर्षे मागे गेला आहे. अतुल देशमुख हे अपक्ष उमेदवार नसून ते सर्वपक्षीय उमेदवार ठरले आहे. ही निवडणूक आता तरुणांनी हातात घेतली असून युवक काय बदल करू शकतात याचे उत्तर २४ तारखेला मिळणार आहे.