अकरावी प्रवेश प्रक्रिया : शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून टाळाटाळ
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपली आहे. या प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी विशेष भरारी पथक नेमण्याचे आदेश शासनाकडून दोन वेळा बजाविले आहेत. मात्र, अद्यापही या पथकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेशाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पथक नियुक्तीसाठी टाळाटाळ केली असल्याची बाब अनेकदा पुढे आली आहे.
पुणे विभागात 296 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या प्रवेशासाठी तीन नियमित व मुख्य फेऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. विशेष फेरीही राबविण्यात आली. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील तीन फेऱ्याही घेण्यात आलेल्या आहेत. या तीनही फेऱ्यामध्ये तीन गटांमध्ये वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया संपली आहे. आता येत्या 10 ऑक्टोबर रोजी प्रवेशाच्या रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
नियमित प्रवेशाबरोबरच व्यवस्थापन, इनहाऊस, अल्पसंख्यांक या राखीव कोट्यातून प्रवेश देण्यात आलेले आहेत. या सर्व प्रवेशाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले भरारी पथक नेमण्यास शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती व पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आदेश बजाविण्यात आले होते. तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत व सध्या शिक्षण उपसंचालकांच्या प्रभारीपदाची सूत्रे असलेल्या प्रवीण अहिरे या दोघांकडून आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, आता भरारी पथक नियुक्त केले तरी त्याचा फारसा उपयोग होणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.