पुणे – आपणच आखलेली धोरणे आणि निर्णयांमध्ये सरकार वारंवार बदल करून आता मतांसाठी केलेल्या प्रत्येक घोषणेत यू-टर्न घेत आहे. त्यामुळे “यू’ हा केंद्रशासनाचा आवडीचा शब्द बनला असून देशाची आर्थिक स्थिती धोकादायक पातळीवर असल्याची असल्याची खरमरीत टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
तसेच पंजाब-महाराष्ट्र बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने घातलेले निर्बंध, बॅंकेचे व्यवहार संशयास्पद या प्रकरणी रिझर्व बॅंकेने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वल्लभ म्हणाले, आतापर्यंत सरकारने तीन वेळा अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांमध्ये बदल केला आहे. आधी सरकारने थेट परकीय गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूकदारांवर कर लावला, कंपन्यांच्या करात कपात केली नाही, पण आता या घोषणांमध्ये सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आलेले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडून वारंवार खोटे आकडे सादर होत आहेत.