पावसात खंड पडल्याने अकोल्यातील भातपिके लागली सुकू
नगर – ढगाळ वातावरण ,काही ठिकाणी सुरू असलेला संततधार रिमझीम पावसाने जिल्ह्यात आज अखेर 433 .91मी.मी. म्हणजेच सरासरी 87.24 टक्की इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सुरवातीस झालेल्या पावसात नंतर मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील एकूण उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील भात पिके ही पावसाचा खंड पडल्याने सुकण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरीची पेरणी झाली असून ती पिके फुलोरा येण्याच्या व दाणे भरण्याच्या स्थितीत असून सद्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पिकांची परीस्थितीही सुधारू लागल्याचे चित्र आहे मात्र सुरवाती नंतरच्या पावसाने ओढ दिल्याने बाजरीच्या पिकाच्या बाबतीतही उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मका,तूर या पिकांच्या बाबतीतही मध्यंतरीच्या काळात लष्करी अळी आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने क्षेत्रीय कर्मचारी या अळींच्या नियंत्रणाबाबत मेळावे,चर्चासत्रे घेवून मार्गदर्शन करीत आहेत.
जिल्ह्यात बाजरीची 86.74 टक्के ,मका 139.36, तूर 271.20, मूग345.98, उडिद402.04, भुईमूग124.47, सोयाबीन 136.53 , कापूस 119.66 टक्के पेरणी झाली असली तरी भुईमूग ,सोयाबीन,कापूस या पिकांवरही अनुक्रमे फुलकिडे ,उंटआळी ,रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत. एकुण पिक परीस्थिती सर्व साधारण असून पिकं वाढण्याच्या अवस्थेत आहेत. काही तालुक्यात पाऊस कमी झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी आहे, येथुन पुढे देखील पिकांसाठी पावसाची आवश्यकता असून मूगाची पेरणी उशीरा झाल्याने शेंगा लागण्याचे प्रमाण कमी आहे. खरीप हंगामाची एकूण 570805.00 हेक्टरवर म्हणजेच सरासरी 119.26 टक्के पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू
गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचे प्रमाण समाधानकारक असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यायोग्य परीस्थिती निर्माण होतांना दिसतेय, त्यामुळे बळीराजाही खुष असून तो पेरणीच्या तयारीला लागला आहे.