पुणे – राज्यभरात एसटीच्या साध्या गाडीने प्रवास करताना रस्त्यात गाडी बंद पडल्यास त्या गाडीचे तिकीट इतर उच्च श्रेणीतील गाड्यांना चालत नव्हते. मात्र, आता प्रवासादरम्यान साधी गाडी बंद पडल्यास कोणताही जादा आकार न घेता उच्च श्रेणीच्या गाडीतून मूळ तिकीटावर प्रवास करता येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ व आर्थिक बचत होणार आहे.
अंमलबजावणी न करणाऱ्यांवर होणार कारवाई
नव्या नियमानुसार कुठल्याही कारणास्तव एखादी गाडी रस्त्यावर बंद पडल्यास प्रवाशांना पुढील प्रवासासाठी इतर कुठल्याही गाडीतून प्रवास करता येणार आहे. यासाठी अतिरिक्त पैसे देऊन तिकीट काढण्याची गरज नसून आपल्या मूळ तिकीटावर प्रवास करणे शक्य होणार असल्याची, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, परिपत्रकातील आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.