पुष्कर – आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाच्या (एनआरसी) अंतिम यादीतून 19 लाखहून अधिक जणांना वगळण्यात आले. त्यामध्ये हिंदूंची संख्या मोठी असल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
संघाच्या तीनदिवसीय समन्वय बैठकीला शनिवारपासून येथे प्रारंभ झाला. बैठकीच्या पहिल्या दिवशी संघाशी संलग्न असणाऱ्या सीमा जागरण मंचाने एनआरसीबाबत तपशीलवार माहिती दिली. एनआरसीच्या अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य हिंदू आहेत. त्यापैकी अनेक अस्सल नागरिक आहेत, असा दावा बैठकीत करण्यात आला.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर तेथील स्थितीबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. मोदी सरकारच्या त्या निर्णयाची बैठकीत प्रशंसा करण्यात आली. बैठकीत पर्यावरण ते अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे सविस्तर पृथ्थकरणही बैठकीत केले जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीनेही संघाच्या बैठकीचे मोठे महत्व आहे. त्यातून कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा आणि बी.एल.संतोष व राम माधव हे भाजपचे पदाधिकारीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.