अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन
पुणे – मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यासाठी नवीन शिष्यवृत्तीसाठी 47 हजार 575 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेची मार्गदर्शक सूचना वाचून, त्यानुसार महाविद्यालय व विद्यापीठांना कार्यवाही करणे आवश्यक आहे. स्कॉलरशीप या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागेल. अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. अर्ज फॉरवर्ड करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत कालावधी दिला आहे.
अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
केंद्र सरकारमार्फत अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठीही 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नव्याने प्रवेश घेतलेले आणि ज्यांना यापूर्वी शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. कोणीही वंचित राहू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.