कराड – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकशाही टिकावी व पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात, यासाठी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावरून त्यांच्या पाठीमागे कोहिनूर मिल खरेदीबाबत ईडीची चौकशी पारदर्शकपणे केली जावी. यामध्ये जर राजकीय आकसापोटी जाणवल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला.
याबाबतचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार यांच्यावतीने नायब तहसीलदार विजय माने यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष दादासो शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, नितीन महाडिक तसेच तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी देशहितासाठी भाजप सरकारला काही प्रश्न विचारले होते. परंतु त्याचे उत्तरे सरकारने अजूनही दिलेले नाही. तसेच देशातील लोकशाही टिकावी व सर्व निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात, यासाठी त्यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे राजकीय द्वेषातून सरकारने कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीची चौकशी सुरू केली आहे.
या माध्यमातून सरकारकडून लोकशाहीची गळचेपी करुन दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशीही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करुन राजकीय हेतूने करण्यात आलेल्या चौकशीच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच या चौकशीत राजकीय आकसापोटी राज ठाकरे यांच्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात आली. तर जिल्हाभर मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला.