काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचे नापाक मनसुबे
नवी दिल्ली -अफगाणिस्तानमधून 100 हून अधिक दहशतवादी आणून त्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवण्याचा खतरनाक डाव पाकिस्तानने रचला आहे. त्यामागे दहशतवादी हल्ले घडवून काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचे नापाक मनसुबे असल्याची माहिती सुरक्षा सुत्रांनी गुरूवारी दिली.
भारताने धडक पाऊल उचलत जम्मू-काश्मीर संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे काश्मीरवर वाईट नजर ठेवणारा पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या निर्णयामुळे काश्मीरमधील स्थिती बिघडल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून कारस्थान रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून अफगाणमधून दहशतवादी आणण्याचा त्या देशाचा डाव आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहिमा राबवून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना मोठा हादरा दिला. त्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांना नेतृत्व उरलेले नाही. त्याशिवाय, स्थानिक दहशतवादी कारवायांच्या दृष्टीने फारसे प्रशिक्षित नाहीत, असे पाकिस्तानला वाटते. त्यातून अफगाणमधून दहशतवाद्यांना आणून त्यांना काश्मीरमध्ये घुसवण्याचा कुटील डाव रचण्यात आला आहे.
पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेचे सुमारे 15 दहशतवादी आधीपासूूनच नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत काश्मीरमध्ये शिरकाव करण्यासाठी दबा धरून बसले आहेत. जैशचा प्रमुख मसुद अजहर याचा भाऊ मुफ्ती रौफ असगर याने अलिकडेच पाकिस्तानात काही दहशतवादी म्होरक्यांच्या बैठका घेतल्या. त्यात त्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याच्या सूचना दिल्याचे समजते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून भारतातील महत्वाच्या ठिकाणी हल्ले घडवले जाऊ शकतात, असा इशारा याआधीच गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क आणि सज्ज झाल्या आहेत.