अयोध्या प्रकरणी दावेदार विशारद यांचे निवेदन
नवी दिल्ली- अयोध्येमध्ये वादग्रस्त जागी मंदिर पाडल्यावरच मशिद बांधली गेली होती. मात्र तरिही हिंदूंनी या भूमीवरचा ताबा न सोडता पूजा करणे सुरूच ठेवले होते, असे आज हिंदू दावेदारावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उपसना करण्याचा अधिकार हिंदूंना असला पाहिजे, असा दावा गोपाल सिंह विशारद यांनी 1950 साली कनिष्ठ न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. विशारद यांचे 1986 साली निधन झाले. मात्र त्यांचे चिरंजीव राजेंद्र सिंह हे हा खटला चालवत आहेत.
1950 साली दाखल केली होती प्रतिज्ञापत्रे
अयोध्येतील वादग्रस्त जागेवरून धार्मिक तणाव निर्माण होऊ लागल्याने तत्कालिन न्यायाधीश मार्कंडेय सिंह यांनी 29 डिसेंबर 1949 रोजी ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यासंदर्भात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंकडून मते मागवण्यात आली होती. दोन्ही बाजूंकडून 20 प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली होती. या प्रतिज्ञापत्रांचा समावेश न्यायालयीन नोंदींमध्येही असल्याचे ऍड. कुमार यांनी सांगितले. ही प्रतिज्ञापत्रे 1950 मध्ये दाखल करण्यात आली होती. पण जागेच्या मालकीबाबतचा खटला त्यानंतर खूप खूप कालावधीने सुरू झाला, याकडेही ऍड. कुमार यांनी लक्ष वेधले. यापैकी एका प्रतिज्ञापत्रात् वरिष्ठ वकिल अब्दुल गनी यांनीही मंदिर पाडल्यानंतरच मशिद बांधली गेली होती. येथे हिंदूंकडून पूजा सुरूच ठेवली गेली. तर मुस्लिम केवळ शुक्रवारी नमाज अदा करत असत, असे म्हटले होते. मात्र प्रतिज्ञापत्रांच्या सत्यतेची पडताळणी करणे आता शक्य नसल्याने न्यायलयाने ही प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यास नकार दिला.
राम मंदिर पाडल्यावरच मशिद उभारली गेली होती. मात्र तरिही याठिकाणी हिंदूंकडून पूजा अर्जा चालू होती. उलटपक्षी या जागेचा ताबा कधीही मुस्लिमांकडे नव्हता, असे विशारद यांच्यावतीने ऍड. रणजीत कुमार यांनी सांगितले.
राम लल्लाच्यावतीने बाजू मांडणाऱ्या ऍड. पराशरण आणि ऍड. वैद्यनाथन यांच्या निवेदनाच्या आधारेच आपणही ही जागा पूजनीय असल्याचे म्हणत आहोत. आपण स्वतः उपासक असल्याने आपल्या उपासनेच्या अधिकाराची पायमल्ली व्हायला नको, असे ऍड. कुमार यांनी सांगितले.