आ. अजित पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोपराष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत
महाराष्ट्रावर पुराचे आलेले नैसर्गिक संकट नसून राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आले आहे. तरी पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे याचा धनादेश दिला जाणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचा पोरकटपणा
सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नसून त्यांनी मागील उणीदुणी न काढता लोकांना मदत करावी. पालकमंत्र्यांच्या वागण्यातून पोरकटपणा दिसून येत आहे. अशा वेळीस सर्व राजकीय पक्षांची एकत्रित बैठक बोलावून महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पालकमंत्र्यांनी पूरस्थितीत जिल्ह्यात थांबणे गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कराड : राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच सातारासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुराचे संकट ओढवले आहे. सरकारने अलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडण्याची कर्नाटक राज्य सरकारला सूचना केली असती तर मोठे संकट टळले असते. यामुळे या निर्माण झालेल्या पुरस्थितीला केवळ राज्य सरकारच जबाबदार असून ही पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केली.
कराड येथे पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आ. अजित पवार म्हणाले, कर्नाटकमधील कुमार स्वामींचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना मुंबईमध्ये ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. मात्र पूरस्थिती टाळण्यासाठी त्यांचेच मुख्यमंत्री असलेले येडीयुरप्पा यांना सूचना करून अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांना का सूचले नाही. लोकांना पुरस्थितीत बाहेर काढण्याची राजकीय इच्छा शक्ती सरकारने दाखवणे गरजेचे आहे.
सातारासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीबाबत राज्य सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रशासनाला योग्य रितीने कामाला लावले पाहिजे. अलमट्टी धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रात, महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांचे सरकार असतानाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबतच्या सूचना वेळीच झाल्या नाहीत. पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सध्या असलेली एनडीआरफची टीम काम करत असली तरी याठिकाणी आणखी टीमची आवश्यकता आहे. हवामान खात्याकडून आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वेळ पडल्यास सैन्य दलासही पाचारण करण्याची गरज आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रशासनाला आणखी गतीने कामाला लावण्याची जबाबदारी सरकारची आहे. पूरस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल, दुध तसेच मुलभूत गरजांचा तुटवडा जाणवत आहे.
पूर ओसरल्यानंतर दुर्गंधीमुळे आजार पसरण्याची जास्त शक्यता असते, यावर उपाय योजना म्हणून संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून, औषध कंपन्यांकडून उपचारासाठीची प्रभावी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी आमची राष्ट्रवादी कॉंग्रेसची डॉक्टर सेलची टीम काम करत आहे. सर्व पूरग्रस्त विभागांना बोटी व लाईफ जॅकेट सरकारने दिली पाहिजेत, अशी मागणी पवार यांनी केली.
कराड शहरावर पुन्हा पुराचे संकट येऊ नये, यासाठी दैत्यनिवारणी मंदिरापासून नवीन पुलापर्यंत गॅबियान ऐवजी आरसीसी संरक्षक भिंतीचे काम व्हावे. तसेच कराड उत्तर मधील भैरवगड येथील टाळेवाडीला दरडीचा धोका असल्याने याची तज्ञांकडून पाहून करून त्यांचे पुनर्वसन अथवा सुरक्षेबाबत उपाय योजना राज्य सरकारने करावी, असेही ते म्हणाले.