पणजी – कोकणासह गोव्याला देखील काही ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे गावातून वाहणाऱ्या खांडेपार नदीने रौद्ररूप धारण केले आहे. गावातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले असून रस्ते, शेती पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारपासून खांडेपार नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असून पाणी ओसरत नसल्याने कुळे परिसरातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने गोव्यात जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवू लागला आहे. दूध, भाजीपाला, मासळी, मटण, अंडी इत्यादांची आयात बंद झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत.
तिलारी धरणाचे पाणी सोडल्यामुळे डिचोली तालुक्यातील साळ गावात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. डिचोलीचे मामलेदार प्रवीण पंडीत यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. एकूण 4 कुटुंबातील 25 जणांना सरकारी यंत्रणेने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. कुळे परिसरातील 6 प्राथमिक शाळा आणि 2 हायस्कूल आणि 4 अंगणवाड्यांना आज सुट्टी देण्यात आल्याची माहिती सरपंच मणी लांबोर यांनी दिली आहे.
सलग आठव्या दिवशीही गोव्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सगळ्यात जास्त फटका डिचोली आणि सत्तरी तालुक्यांना बसला आहे. डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील नद्यांना पूर आला असून काठावरील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.