कोल्हापूर (प्रतिनिधी) – तुमच्या शेतीची चिंता तुम्ही करू नका. जे काही नुकसान झाले असेल त्याची भरपाई दिली जाईल, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिला आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी पुल येथे भेट देवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज रेस्क्यू ऑपरेशन आणि पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.
यानंतर कल्याणी हॉल येथे पूरग्रस्तांच्या शिबीराला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ते म्हणाले, तुमच जीवन महत्वाचं आहे. तुम्ही सुखरूपणे बाहेर आलात याच जास्त समाधान आहे. जे काही तुमच्या शेतीचे नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची चिंता करू नका. ती आमची जबाबदारी आहे.
यानंतर त्यांनी छत्रपती शाहू विद्यालय येथील पूरग्रस्त शिबीराला भेट दिली. येथील पूरग्रस्तांसाठी केलेली व्यवस्था पाहून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना घरांची तसेच शेतीची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना आरोग्याची सुविधा दिली जाईल, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.