दूध, भाजीपाल्यासह इतर साहित्याच्या तुटवड्यामुळे नागरिकांची गैरसोय
भाजीपाल्याची जादा दराने विक्री
जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती उद्भवली असल्याने राज्य महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी सर्वच वस्तूंची आवक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र त्याचा फायदा काही स्थानिक भाजीपाला व इतर किरकोळ विक्री करणारे व्यावसायिक उठवत आहेत. सध्या शहरात उपलब्ध असणारा भाजीपाला, दूध पिशवी तसेच इतर साहित्याची जादा दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत. एकीकडे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह सामाजिक कार्यकर्ते धडपडत आहेत. तर दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.
कराड – मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आल्याने सोमवारी रात्रीपासून सर्व राज्य महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. कराड शहरामधून जाणारा व नेहमी गजबजलेला दिसणारा पुणे-बेंगलोर महामार्ग मंगळवार दुपारपासून ओस पडलेला दिसत होता. तसेच कराड शहरासह तालुक्यातील सर्व वाहतुकीचे मार्ग बंद झाल्याने दूध, भाजीपाल्यांची आवक होऊ शकली नाही. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील तसेच लगतच्या गावातील अनेक शेतकरी व छोटे-मोठे व्यावसायिक आपला भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. मात्र गत तीन दिवसांपासून सर्वत्रच पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला कराड येथे विक्रीसाठी आणणे शक्य झालेले नाही.
तसेच सोमवारी रात्रीपासून राज्य महामार्गही बंद ठेवण्यात आल्याने कोयना, चितळे अशा विविध दूध संघाच्या गाड्या, अथवा किरकोळ दूध विक्री करणारे व्यावसायिकही येऊ न शकल्याने कराड शहरात दुधासह भाजीपाल्याचा तुटवडा जाणवला.
बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने तसेच कोयना धरणातून पाणी सोडले जात असल्याने आणखी दोन ते दिवस भाजीपाल्याची आवक होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आणखी दोन दिवस टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.