पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सकाळी वाढविण्यात आला आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणातून ४१६२४ क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तर त्यामध्ये वाढ करून सकाळी ९ वाजता ४५४७४ क्यूसेक्स इतके करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने विसर्ग ही वाढविण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारीही धरण परिसरात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरणात 14 मिमी, पानशेतमध्ये 51 मिमी, वरसगावमध्ये 62 मिमी आणि टेमघरमध्ये 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पानशेत-9,892, वरसगाव-13,700 आणि टेमघरमधून 2,943 क्युसेकने पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे.