मुंबई : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. दरम्यान, पुराचे पाणी घरात शिरून अनेकांचे संसार पाणीत गेले आहेत. अशा नागरिकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रति कुटूंब 5 हजार रु. देण्यात येणार होते त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सरकारकडून अगोदर प्रति कुटूंब 5 हजार रुपये देण्यात येणार होते. त्यात आता वाढ करत सरकारने प्रति कुटूंब 10 हजार रु. करण्याचा निर्णय सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक काळासाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पुर्णत: वाहून गेल्यास किंवा घरांचे पुर्णत: नुकसान झाले असेल तर कपडे, भांडी आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही आर्थिक मदत प्रति कुटूंब 5 हजार रुपये एवढी असते परंतु, यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता यात वाढ करत सरकारने प्रति कुटूंब 10 हजार रु. करण्याचा निर्णय घेतला आहे.