एसटीच्या अडीच हजार फेऱ्या रद्द; पुणे-मुबंईच्या फेऱ्या सुरळीत
प्रशांत जाधव
सातारा – गेली पंधरा दिवस सातारा जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासोबतच लोकांच्यासोबतच पावसाचा मोठा फटका एसटीला बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावासामुळे एसटी आडीच हजार फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे एकोणीस लाखाचे नुकसान झाले आहे. पाटण आगाराच्या तर सर्वच फेऱ्या रद्द झाल्याने एसटीची चाके थांबली आहेत.
गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी रात्रीपासून अधिक जोर धरला. अविरत कोसळणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, बहुतांश वाहतूक खंडित झाली आहे. यामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रमुख जिल्हा मार्गांसह अनेक ग्रामीण मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने, दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. याबरोबरच ग्रामीण भागातील वीज व दूरध्वनी सेवांसाह एसटीचे फार मोठे नुकसान झाले आहे.
रविवार व सोमवार या दोन दिवशी एसटीच्या सातारा विभागाच्या जवळपास दोन हजार पाचशे फेऱ्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. यात एकूण रविवारी 37 हजार किलोमीटर तर सोमवारी 46 हजार 937 किलोमीटर अशा एकूण 80 हजार किलोमीटर जाणाऱ्या एसटी गाड्या गेल्या नाहीत. परिणामी एसटीचे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. रविवारपासून सुरू असलेला पाऊस अजून काही दिवस तसाच सुरू राहीला तर एसटीला कोट्यावधी रुपयांचा फटका बसलण्याची शक्यता असल्याची भिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खटाव-माण फेऱ्या सुरळीत
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असल्याने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, खटाव- माण तालुक्यात पावसाने दडी मारल्याने या तालुक्यातील सर्व रस्ते वाहतूकीला खुले असल्याने या तालुक्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू आहेत.
जागा मिळेल तिथे एसटी बस उभ्या
सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे एसटीच्या बसेच जागा उपल्बध होईल त्याठिकाणी सुरक्षीत उभ्या केल्या जात आहेत. पाटण आगाराच्या बसेस तर ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळांच्या आवारात उभ्या केल्या आहेत.
एसटीच्या सातारा विभागाकडून पुणे- मुंबईला जाणाऱ्या सर्व फेऱ्या सुरळीत आहेत. मात्र, पावसामुळे तसेच रस्ता खचल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी घराबाहेर पडणे टाळल्याने त्याही फेऱ्या आर्थिक नुकसान सहन करूनच सुरू आहेत. पाटण आगारातील सर्व बस फेऱ्या पावसामुळे रद्द केल्या असून आवश्यतेनुसार जिल्ह्यातील अनेक फेऱ्या बंद करत आहोत.
सागर पळसुले विभागीय नियंत्रक, सातारा.