येरवडा – गेले काही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आज ओसरला. त्यामुळे येरवडा परिसरातील सोसायट्या, घरांमध्ये घुसलेले पाणी ओसरू लागले आहे. शांतीनगर, भारतनगर, इंदिरानगर वसाहतीमधील पाणी दुपारी दोनच्या सुमारास ओसरू लागले; पण अद्यापही काही भागातील घरांमध्ये पाणी आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले असून सोसायट्या व घरांमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर आलेला गाळामुळे चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. हा चिखल काढण्याचे काम नागरिकांनी हाती घेतले आहे; पण चिखल साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाणी घरात शिल्यामुळे घरातील सगळ्या वस्तू खराब झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपडे, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या आहेत. आता ते भंगारात देण्याचीच परिस्थिती आली आहे. नदीच्या पाण्यात वाहून आलेला कचरा संपूर्ण वसाहतीमध्ये पसरला आहे. काही ठिकाणी पालिकेचे स्वछता कर्मचारी नसल्याने तो तसाच पडून आहे. या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यात अर्धी घरे पाण्यात असल्याने वीज गायब झाली असून अंधारातच नागरिकांना पाणी काढावे लागत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही वीजपुरवठा खंडित झालेला आहे.
औषध फवारणी करण्याची मागणी
घराघरांत पावसाचे पाणी साचल्यामुळे उंदीर, घुशी, गोम, मोठे किडे मृत अवस्थेतून दिसून येत आहेत. त्यामुळे रोगराई पसण्याची भीती असून घराघरांत औषधे फवारणी करावी, अशी मागणी अनिता लखन व इंद्रायणी धहयालकर यांनी केली आहे. मात्र, अद्यापही पालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.