नगर – पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामे सोपविले जात आहेत. त्यामुळे अधिकार व कर्मचारी तणावाखाली कामे करीत आहेत. अधिकार व कर्मचारी माणूसच आहेत, या नजरेतून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले.
नगर पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी अलका शिरसाठ या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती रामदास भोर होते. जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सदस्य संदेश कार्ले, माजी जि. प. सदस्य बाजीराव गवारे, गटविकास अधिकारी डॉ. वसंतराव गारुडकर, उपसभापती प्रवीण कोकाटे, पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काहे, संदीप गुंड, विस्तार अधिकारी सुवर्णा लोंढे, चंद्रकांत खाडे, ठकाराम तुपे, किशोर जगताप, सरपंच अनिल करांडे, आबासाहेब सोनवणे, कैलास पटारे उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले, सेवानिवृत्त गटविकास अधिकार शिरसाठ यांनी पंचायत राज व्यवस्थेत लिपिकापासून गटविकास अधिकारी या सर्व पदांवर 37 वर्षे निष्कलंक सेवा केली. त्यांन सेवा करताना सचोटी, कर्तव्यनिष्ठ भावनेतून कामे केली. नगर तालुक्यात तीव्र दुष्काळात पाणी टंचाई, जनावरांच्या छावण्या व तालुक्यात विविध विकास योजना राबविल्या. भोर म्हणाले, गटविकास अधिकार शिरसाठ यांनी नगर तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यांनी प्रशासनात प्रत्येक विभागात काम केल्याने प्रत्येक विभागाचा अनुभव घेतला. यावेळी कार्ले, झोडगे, माजी जि.प. सदस्य बाजीराव गवारे, गटविकास अधिकारी वसंतराव गारुडकर, दरेवाडीचे सरपंच अनिल करांडे, आबासाहेब सोनवणे, श्रीगोंदा तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संदीप लगड यांची भाषणे झाली.