भाजप-शिवसेनेलाही लवकरच गळती लागणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पदासाठी दोन नावांची प्रथमच चर्चा
पुणे – सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून साम, दाम, दंड आणि भेद या सूत्राचा वापर करून समोरच्या पक्षातील नेत्यांना नमवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधले नेते भाजप आणि शिवसेनेत जात आहेत. त्याचे आम्हांला काहीच दु:ख नाही. उलट काही माणसे जाण्याचीच वाट आम्ही पाहात होतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांना संधी देणार आहोत,’ असे त्यांनी यावेळी नमूद केले.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पाटील यांनी शनिवारी पुण्यात घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भाजप-शिवसेना दिसेल त्याला पक्षात घेत आहे; हे जनतेला पटणारे नाही. ज्या मतदार संघात भाजप-शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत, तेथे त्यांच्या पक्षाचे नाराज कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यांच्या पक्षालाही गळती लागणार आहे, असे भाकीतही पाटील यांनी सांगितले. तसेच युतीत मुख्यमंत्री कोण अशी स्पर्धा सुरू आहे. दोन मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, हा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहे, असेही पाटील म्हणाले.