सातारा: सातारा पोलीस दलातील महिला पोलीस हेडकाॅन्सटेबल दया डोईफोडे यांचा निवडणुक आयोगाकडून सन्मान करण्यात आला आहे. निवडणुका शांततेत व निर्भयपणे पार पाडणे या गटात डोईफोडे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्राच्या आतमध्ये गाडी आण्यावरून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व डोईफोडे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अनेक उपस्थितांनी चरेगावकर हे मंत्री दर्जाचे नेते असून त्यांची गाडी आत सोडा अशी डोईफोडे यांना विनंती करून देखील त्यांनी चरेगावकर यांना आत सोडले नव्हते. डोईफोडे यांनी दबावाला बळी न पडता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यानेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांचा सन्मान केला आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणार्या पहिल्या ‘लोकशाही पुरस्कारांची’ आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबई येथे केली. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २७) वितरण करण्यात येणार आहेत.
यावेळी सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०१६ आणि २०१७ या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
गटनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे अशी
निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे:
१) माथेरान हॉटेल असोसिएशन
२) मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ
३) महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह
४)असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्
५)मुंबई विद्यापीठ मुंबई
६)रिसोर्स ॲण्ड सपोट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट
७) संदीप भास्कर जाधव, सोलापूर.
निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे:
१) डॉ.अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली,
२) दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड
३) केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद
निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती:
१) गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे.
निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
१) माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन.
निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे:
१) बृहन्मुंबई महानगरपालिका
निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ:
१) ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.