श्रीहरीकोटा : सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या ‘चांद्रयान-2’चे उद्या 22 जुलैला प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे यान उड्डाण घेणार आहे. दुपारी 2.43 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’चे उड्डाण होईल. इस्त्रोने सगळी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के.सिवन यांनी दिली. आज रात्रीपासून त्याचे काऊंटडाउन सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आधी क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना तांत्रिक दोष आढळल्याने तासभर आधी चांद्रयान-2चे उड्डाण रद्द करण्यात आले होते. आता बिघाड दुरुस्त करण्यात आला असून त्याचे नेमके कारण कळाले आहे. त्यामुळे यावेळी अडचण येणार नाही अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
याआधी 15 जुलै रोजी मध्य रात्री चांद्रयान-2 चे प्रक्षेपण होणार होते. पण ऐनवेळी तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ही मोहिम स्थगित करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून जीएसएलव्ही मार्क 3 च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार होते. पण प्रक्षेपण होण्याच्या 56 मिनिटे आणि 24 सेकंद आधी मोहीम थांबवण्यात आली. जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये इंधन भरत असताना तांत्रिक चूक आढळली आणि हा निर्णय घेण्यात आला. चांद्रयान-2चे प्रक्षेपण थांबवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. संपूर्ण मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात इतकी मोठी तांत्रिक दोष असल्यामुळेच मोहीम पुढे ढकलण्यात आली. जर या दोषाकडे दुर्लक्ष केले असते तर संपूर्ण मोहीमच फसली असती आणि 11 वर्षापासून भारतीय शास्त्रज्ञांनी पाहिलेले स्वप्न व 960 कोटी रुपये पाण्यात गेले असते.