अमरिंदर सिंग: सरकारमध्ये शिस्त आवश्यक
नवी दिल्ली – पंजाबच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना कामच करायचे नसेल; तर मी काहीच करू शकत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी दिली. प्रमुखाने दिलेली जबाबदारी सैनिक कशी काय नाकारू शकतो, असे म्हणत त्यांनी सिद्धू यांना फटकारले.
अमरिंदर यांनी मागील महिन्यात पंजाब मंत्रिमंडळात फेरबदल केले. त्यानुसार सिद्धू यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी त्यांच्याकडील नव्या खात्याचा (ऊर्जा) कार्यभार महिना उटलून गेला तरी स्वीकारला नाही. त्यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच, सोमवारी अमरिंदर यांच्याकडे राजीनामा पाठवला. त्यापार्श्वभूमीवर, दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या अमरिंदर यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सिद्धू यांना कानपिचक्या दिल्या. सरकार प्रभावीपणे चालण्यासाठी शिस्त आवश्यक आहे.
पंजाबच्या इतर 12 मंत्र्यांनी नवा कार्यभार स्वीकारला. एकटे सिद्धूच नाराज का झाले? पंजाबसाठी वीज हा महत्वाचा मुद्दा असल्याने संबंधित खाते मी सिद्धू यांच्याकडे सोपवले. एकदा निर्णय झाल्यावर मी ते घेतो, मी ते घेणार नाही असे म्हणता येऊ शकत नाही, असे अमरिंदर म्हणाले. अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात मागील काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता. तशातच खातेबदल झाल्याने सिद्धू यांच्या नाराजीत भर पडल्याचे मानले जाते. आता मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काय पाऊल उचलणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.