लखनौ – कर्नाटकमधील घडामोडींचा आधार घेऊन बसपच्या प्रमुख मायावती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. धनशक्तीचा गैरवापर करून आणि ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपने केंद्राची सत्ता राखली. मात्र, त्याआधी काही विधानसभा निवडणुकांमध्ये त्या पक्षाचा पराभव झाला. त्याचा राग काढण्यासाठी त्या पक्षाकडून विरोधकांची सरकारे पाडण्याची मोहीम राबवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपकडून कर्नाटक आणि गोव्यात केली जाणारी आमदारांची फोडाफोडी हा लोकशाहीवरील कलंक आहे. पक्ष बदलणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कठोर कायदा करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया मायावती यांनी ट्विटरवरून दिली. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशामागे ईव्हीएममधील छेडछाड असल्याचा आरोप मायावती यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.