नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले असल्याचा दावा मंगळवारी गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत केला.
यावेळी राय यांनी म्हटले की, सीमारेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सरकारकडून अंमलात आणल्या जात असलेल्या झिरो टॉलरन्स पॉलिसीचे परिणाम आता दिसत आहेत. जवानांकडून केल्या जाणाऱ्या ठोस कारवाईमुळे व सरकारकडून भारत-पाकिस्तान सीमा रेषेवर विद्युत कुंपण घालण्यात आल्याने देखील 2018 च्या तुलनेत यंदा जून महिन्यापर्यंत घुसखोरीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे, असे राय यांनी सांगितले.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान संबंधात मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवाय सीमारेषेवरही सुरक्षा व्यवस्था अधिकच वाढवण्यात आली होती. सीमेवर विद्युत कुंपण घालण्याचे काम चालू आहे.