अमित शहा: आमचा पक्ष विचारसरणीच्या जोरावर चालतो
हैदराबाद -निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पक्षांमध्ये फूट पडते. मात्र, आमच्या पक्षात तसे घडत नाही, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या आणि इतर पक्षांतील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला.
तेलंगणमधील भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभ शनिवारी केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या शहा यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, केवळ एका पराभवामुळे अनेक पक्ष विखुरल्याची उदाहरणे देशाच्या निवडणूक इतिहासात पाहावयास मिळतात. ते पक्ष एखाद्या व्यक्तीच्या, कुटूंबाच्या किंवा जातीच्या आधारावर चालत असल्याने अपयशापुढे तग धरू शकत नाहीत.
मात्र, भाजपच्या बाबतीत तसे घडत नाही कारण आमचा पक्ष विचारसरणीच्या जोरावर चालतो. एकवेळ लोकसभेत भाजपचे केवळ दोन सदस्य होते. त्यावरून माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी भाजपची खिल्ली उडवली. मात्र, आज अशी स्थिती बनलीय की कॉंग्रेसला संसदेत प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकत नाही. त्याउलट, भाजप स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आहे, असेही त्यांनी म्हटले.