मुंबई – मराठा आरक्षण कोर्टाने वैध ठरवल्यानंतर शिक्षणात देखील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणात सुध्या 12 टक्के आरक्षण दिले असून, आता शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबतचे निवेदन सादर केले आहे.
एसईबीसी प्रवर्गात 34,251 राखीव जागांपैकी 4557, तर ईडब्लूएस प्रवर्गात 28,636 जागांपैकी 2600 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही प्रवर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याने त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी 4 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.