हैद्राबाद – दुखापतींमुळे अनेक बेळेला अव्वल कामगिरीच्या संधीपासून वंचित व्हावे लागते. त्यामुळेच खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्ती व योग्य आहार याकडे लक्ष दिले पाहिजे असे बॅडमिंटनचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.
भारताच्या सायना नेहवाल हिने यंदा इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तिचा अपवाद वगळता भारताच्या एकाही खेळाडूला यंदाच्या मोसमातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविता आलेले नाही. बी. साईप्रणीत व किदम्बी श्रीकांत यांना अनुक्रमे स्पेन मास्टर्स व इंडियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते.
गोपीचंद यांनी सांगितले की, अनेक वेळा शंभर टक्के तंदुरुस्ती नसेल तरीही अव्वल यश मिळविता येत नाही. पुढील महिन्यात इंडोनेशिया, जपान व थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये आपल्या देशातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.