पुणे – मान्सूनची वाटचाल सुरू असून रविवारी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबादपर्यंत त्याने मजल मारली आहे. अशाच प्रकारे मान्सूनची वाटचाल सुरू राहिली, तर मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
कोकण आणि गोव्यात दाखल झाल्यानंतर मान्सूनने प्रगती करत मराठवाडा आणि विदर्भाचा काही व्यापला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामांना ही वेग आला आहे.
दरम्यान, रविवारी कोकणातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, तर घाट माथ्यावरही पावसाचा जोर आहे. सलग पाऊस नसला, तरी दिवसभरात अधूनमधून एक ते दोन सरी होत आहेत. पश्चिम भागापेक्षा पूर्व भारतातून मान्सूनचा प्रगतीचा वेग अधिक असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.