वानवडीतील घटनेनंतर आपत्कालीन व्यवस्थेचे दोष चव्हाट्यावर
पुणे / वानवडी – पोळ फुटून मधमाशांनी हल्ला केल्यानंतर घडलेल्या घटनेला कसे सामोरे जायचे किंवा अशा आपत्कालीन घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करायच्या, याबाबत पोलीस आणि अग्निशमन दल अनभिज्ञ असल्याचे वानवडी येथील घटनेमुळे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना कळविले होते. त्यांनी हात वर करत “आमच्याकडे कोणतीही उपाययोजना नाही,’ असे सांगितल्याने संताप व्यक्त होत आहे.
वानवडी येथील गवळी-धाडगे नगर परिसरातील मधमशांच्या हल्लाप्रकरणावेळी येथील नागरिक जगन्नाथ खोपकर यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला कळविले होते. पण त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे आता अशा घटना घडल्यानंतर तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीच यंत्रणा नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनेवेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकरदेखील उपस्थित होते. त्यांना या घटनेबाबत विचारले असता पालिकेकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या भोवती असणाऱ्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला, पण मला मात्र काही त्रास झाला नाही. त्यामुळे मी तातडीने जखमी नागरिकांना रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.यापुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेने शहरात विविध ठिकाणी असणारी मधमाशांची पोळ शोधून ती त्वरीत हटवावीत,’ अशी मागणी शिवरकर यांनी केली आहे. याप्रकरणानंतर वानवडी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील म्हणाले, “या घटनेत दत्तात्रय गवळी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच हा मृत्यू कशामुळे झाला,’ हे समजू शकेल.