कोपरगाव: मुलीचा विवाह झालेला असतानाही ते लपवून ठेवून ती अविवाहित असल्याचे भासवून लग्न लावून दिले. तसेच तीन लाख रुपयांची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाने दाखल केली आहे. याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी किशोर आसाराम मिसाळ (रा. दहेगाव बोलका) यांच्याशी शंकर रामकिसन मंचरे, छबूबाई शंकर मंचरे, आबासाहेब कोरडे, आबासाहेबची पत्नी (नाव माहीत नाही), भानुदास किसन चोरमारे (सर्व रा. डावरवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी मुलीच्या लग्नासाठी मिसाळ यांच्याशी बोलणी केली. तसेच मंचरे यांची मुलगी अर्चना हिचा यापूर्वी गोपीनाथ भोजने याच्याशी विवाह झाला असतानाही ती अविवाहित असल्याचे सांगत लग्न लावून दिले. त्या बदल्यात आरोपींनी फिर्यादीकडून अडीच लाख रुपये रोख घेतले. तसेच 37 हजार 500 रुपयांचे दागिनेही घेतले. लग्नाचा सर्व खर्चही करण्यास भाग पाडले. त्यामुळे मिसाळ यांची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली.
त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी आरोपींनी फिर्यादीस एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्चना हिने मिसाळ यांच्या घरातील कपाटातून 16 हजार रुपये रोख, दोन मोबाईल, वाहनांच्या चाव्या, लग्नात केलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शंकर रामकिसन मंचरे, छबूबाई शंकर मंचरे, आबासाहेब कोरडे, आबासाहेबाची पत्नी (नाव माहीत नाही), भानुदास किसन चोरमारे (सर्व रा. डावरवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), अर्चना गोपीनाथ भोजने, गोपीनाथ भाऊसाहेब भोजने, भाऊसाहेब भोजने (रा. जारवकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), परमेश्वर गाडे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव), कविता बाळू बाहुले, हिराबाई रहाटवाड, योगिता रहाटवाड (रा. सातारा गाव, खंडोबा मंदिराजवळ, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध फसवणूक, खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.