मुंबई: मुंबईतील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहारकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी आपल्या चौकशी अहवालात ताशेरे ओढले आहे. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे मेहता यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. शिवाय विरोधकांनी भाजपावर देखीप टीका करणे सुरू केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पारदर्शक कारभाराचा दिखावा करणाऱ्या फडणवीस सरकारचा परदाफाश झाला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एम. पी. मिल कंपाउंड एसआरए घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरवल्याची माहिती अखेर समोर आली आहे.
एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी आम्ही वारंवार विधानसभेत लावून धरली होती. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला. फडणवीस सरकारच्या इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का, असा सवाल जयंत पाटील उपस्थित केला आहे.