जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत दोन लाख भाविकांचा भक्तीसागर उसळला होता. सदानंदाचा येळकोट.. येळकोट.. येळकोट.., जय मल्हार…असा जयघोष करीत राज्याच्या विविध प्रांतातून विशेषतः कोकणी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. देवदर्शन, कऱ्हा स्नानाची पर्वणी लुटत, तळीभंडार, जागरण गोंधळ, कोटमा पूजन करीत आपली भोळी भाबडी श्रद्धा श्रींच्या चरणी अर्पण केली.
सोमवारी अमावस्या आली की, त्या दिवसाला सोमवती यात्रा म्हणतात, या दिवशी अमावस्या पर्वकाळात खंडेरायाच्या उत्सवमूर्ती पालखी सोहळ्याद्वारे गडकोटातून कऱ्हा नदीतीरावर नेल्या जातात राज्याच्या विविध प्रांतातून आलेले भाविक आणि समस्त जेजुरीकर खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी यांच्या वतीने उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक स्नान घालण्यात येते. यावेळी सोमवारी (दि.3) सकाळी 8 वाजता मुख्य वतनदार, इनामदार, पेशवे यांनी आदेश देताच भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत गडकोट आवारातून पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त राजकुमार लोढा, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, ऍड. अशोक संकपाळ, तुषार सहाणे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, नित्य वारकरी, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे यांच्यासह शहरातील अठरा पगड जातीधर्मातील मानकरी, खांदेकरी, पुजारी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोहळ्यापुढे घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर…, छत्र चामरे, अब्दागिरी, मानाचा अश्व आदींच्या साथीने पालखी सोहळा मल्हार गौतमीश्वर मंदिरात स्थिरावला. त्यानंतर मुख्य शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजबांधव पानसरे यांच्या विड्याच्या पानाचा मान स्विकारुन धालेवाडीमार्गे कऱ्हा नदीतीराकडे मार्गस्थ झाला. दुपारी साडेअकराच्या सुमारास रंभाई शिंपिण कट्टा-पापनाश तीर्थावर खंडोबा-म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना विधीवत दही-दुधाने स्नान घालण्यात आले. यंदा भीषण दुष्काळामुळे कऱ्हा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने देवसंस्थानच्या वतीने श्रींच्या व भाविकांच्या स्नानासाठी दोन टॅंकर ठेवण्यात आले होते.
स्नान, धार्मिक विधी उरकल्यानंतर पालखी सोहळा धालेवाडी गावात दुपारी 4 वाजेपर्यंत स्थिरावला, त्यानंतर फुलाई माळीण कट्टा, जानाईदेवी कट्टा येथे मान-पान देत-घेत सायंकाळी उशीरा पालखी सोहळा गडकोटात दाखल झाला. रोजमुरा (तृणधान्य) वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, रामदास शेळके, गणेश पिंगुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवसंस्थानच्या वतीने भाविक, खांदेकरी, मानकरी यांच्यासाठी थंड पाणी बाटली, अल्पोपहार उपलब्ध करून दिला.
रखरखत्या उन्हात पाय भाजू नयेत म्हणून पायमोजेही वाटप करण्यात आले होते. तर परिवहन मंडळाने जादा बस ठेवल्या होत्या. सोमवती असल्याने आज जेजुरी बाजारातही हार-फुले, भंडारा खोबरे, प्रसादपुडे, खेळणी, मिठाई यांची मोठी उलाढाल झाली.