जम्मू – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जम्मू काश्मीर मधील सीमावर्ती भागात राहणाऱ्या गावकऱ्यांशी सीमा सुरक्षा दलाच्या जवांनांनी शनिवारी संवाद साधला. त्या भागातील सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे काम सीमा सुरक्षा दलाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हा संवाद साधला. सीमा भागात होणाऱ्या चकमकी, घुसखोरी, मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार या साऱ्या घटनांचा सीमावर्ती भागातील लोकांना त्रास सहन करावा लागतो.
या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सीमा दलाला गावकऱ्यांचीही मदत लागते त्या अनुषंगाने सीमा दलाच्या अधिकाऱ्यांनी अनेक गावांमध्ये बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. गावकऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी ग्राम समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या समित्यांच्याही बुंधतीप, गल्लर, नर्सरी, चकफकीरा इत्यादी भागात बैठका घेण्यात आल्या.