गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यांत 2.53 लाख कोटींची वाढ
मुंबई – नवे सरकार अर्थव्यवस्था मजबूत करेल व कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत जाईल या कारणामुळे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 623 अंकांनी म्हणजे 1.61 टक्क्यांनी वाढून 39,434 अंकावर बंद झाला तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 187 अंकांनी वाढून 11,844 अंकांवर बंद झाला. यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात 2.53 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1503 अंकांनी तर निफ्टी 437 अंकांनी वाढला आहे. हे सरकार उद्योग क्षेत्रासमोरचे सर्व प्रश्न सोडवेल त्याचबरोबर उद्योगाची उलाढाल वाढण्यासाठी पूरक उपाययोजना करेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
शुक्रवारी सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर चार कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, वेदांत, टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर चार टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअरबाजारात सर्व म्हणजे 19 क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. रिअल्टी, भांडवली वस्तू, दूरसंचार आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक चार टक्क्यापर्यंत वाढले. स्मॉल कॅप 2.43 टक्क्यांनी तर मिडकॅप 2.0 टक्क्यांनी वाढले. काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1352 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे या तेजीत हे गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. .
“गेल्या पाच वर्षात सरकारने आर्थिक शिस्त बाळगून स्थूल अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. आता तेच सरकार अधिक मताधिक्क्य मिळाल्यामुळे विकासदर वाढविण्यासाठी अधिक उपाययोजना करू शकणार आहे. देशांतर्गत उत्पादनाबरोबरच परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून देशातील व परदेशातील गुंतवणूकदार एकतर्फी खरेदी करीत आहेत.
-विशाल कंपानी, व्यवस्थापकीय संचालक, जेएम फायनान्स समूह