हैदराबाद – मास्टर कार्ड कंपनीने भारतात सात हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. या कंपनीचे भारतात सध्या दोन हजार कर्मचारी काम करतात. हे उच्चशिक्षित तंत्रज्ञ आहेत.आगामी पाच वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढून 4,000 करण्याचा कंपनीचा इरादा आहे.
कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले की, 2013 मध्ये कंपनीचे केवळ 29 कर्मचारी होते. आता कंपनीच्या भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या 2000 झाली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 14 टक्के आहे. आम्ही पुढील पाच वर्षात आणखी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्यामुळे या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. भारताने गेल्या पाच वर्षांत डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना दिली असल्यामुळे कंपनी भारताबाबत आशावादी आहे, असे ते म्हणाले.