नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून आक्षेप घेणारी आणि राहुल गांधी यांना निवडणूक प्रक्रियेतून बाद ठरवण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ब्रिटनस्थित एका कंपनीच्या वर्ष 2005-06 च्या अहवालामध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख आहे. हा हवाला देऊन त्यांच्या नागरिकत्वाविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती.
मात्र केवळ एका कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख केला, म्हणून राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक होत नाहीत, असे सांगून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही याचिका फेटाळून लावली. ही याचिका जय भागवान गोयल आणि सीपी त्यागी यांनी दाखल केली होती.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाविषयी नोव्हेंबर 2015 मध्येही आक्षेप घेतला होता. मात्र त्याविषयी केंद्र सरकार आणि आणि निवडणूक आयोगाने काहीही कृती केली नसल्याने याचिकाकर्त्याला असमाधान वाटत असावे. अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने जोडली. न्यायालयाच्या या निकालामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.