वाराणसी – कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून “औरंगजेब’ म्हटल्याच्या वक्तव्याचा भाजपने जोरदार समाचार घेतला आहे. विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतामध्ये जे काही केले त्याची आठवण करून देण्याचे मोलाचे काम विरोधकांकडून केले जाते, असे भाजपने सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभेसाठीचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कोरिडोर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या पाडापाडीवर टीका करताना निरुपम यांनी पंतप्रधानांना उद्देशून “आधुनिक काळतील औरंगजेब’ असे संबोधले होते. त्यावर भाजप नेते नलिन कोहली यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निरुपम हे वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. एखाद्या विचित्र कारणासाठी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचा संदर्भ ते देत असतात. आक्रमणकर्त्यांनी जे केले त्याची बरोबर आठवण कॉंग्रेसला येते. मात्र देशाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्यांची कॉंग्रेसला आठवण होत नाही, असेही कोहली म्हणाले.
सत्तेत असताना इतक्या वर्षात कॉंग्रेसने कधीही काशी विश्वनाथ मंदिराची चिंता केली नाही. जेंव्हा मोदी सरकारकडून काही काम केले जात आहे, तेंव्हा राजकारण केले जात आहे आणि अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. मात्र या वक्तव्यांना योग्य ते प्रत्युत्तर जनतेकडूनच दिले जाईल, असे कोहली म्हणाले.