गोड्डा (झारखंड) – पुढील पाच वर्षात भारत ही जगातील तिसरी आर्थिक शक्ती होईल असा विश्वास गृहमंत्री व भाजप नेते राजनाथसिंह यांनी व्यक्त केला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या पाच वर्षांत मोठी कामगीरी करून दाखवली असून हेच सरकार देशाचा विकास करू शकते ही खात्री आम्ही देशातील जनतेला पटवून दिली आहे असेही त्यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना सांगितले.
गेल्या साडे चार वर्षात मोदी सरकारने देशातील 1 कोटी 30 लाख लोकांना पक्की घरे बांधुन दिली असून पुढील पाच ते सात वर्षात देशातील एकही परिवार दारिद्य्र रेषेखाली राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या साडे चार वर्षांच्या काळात आमच्या सरकारने साडे सात कोटी कुटुंबांना गरीबी रेषेच्यावर आणले आहे असा दावाही राजनाथसिंह यांनी केला.