हिस्सार – महाभारतात अहंकारामुळेच दुर्योधनाचा अंत झाला. मोदींनी ही बाब लक्षात घ्यावी. हा देश अहंकाराला कधीच माफी देत नाही असा इशाराही प्रियांका गांधी यांनी दिला आहे. आज हरियानात एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. मोदींनी दिवंगत राजीव गांधी यांच्यावर तीव्र टीका केली आहे त्या पार्श्वभूमीवर प्रियांकांनी त्यांच्यावर हा निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या की त्यांना बोलायला काहीही उरले नाही की त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या कुटुंबियांचा अवमान केला आहे. त्यांच्यात घमेंड आणि अहंकार आहे. पण अहंकार कधीच यशस्वी होत नाही हा या देशाचा इतिहास आहे. महाभारतही त्याचा पुरावा आहे. दुर्योधनाकडेही हाच अहंकार होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे गेले आणि त्यांनी सारी वस्तुस्थिती त्याला समजाऊन सांगितली. त्यावेळी दुर्योधनाने त्यांनाही पकडण्याचा प्रयत्न केला होता असे त्या म्हणाल्या. त्यांनी यावेळी रामधारीसिंग दिनकर यांच्या कृष्ण की चेतावनी या काव्य पंक्तीतील काहीं ओळीही म्हणून दाखवल्या.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस या नात्याने प्रियांका गांधी यांच्यावर पुर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तथापी त्या राज्याबाहेर त्यांनी क्वचितच प्रचार केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना हरियानातील प्रचारासाठीही पहिल्यांदाच उतरवले आहे.
दरम्यान प्रियांका गांधी यांच्या टीकेला तातडीने प्रत्युत्तर देताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे की आज प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा दिली आहे. पण कोणी म्हटल्यामुळे कोणीच दुर्योधन होत नसतो. कॉंग्रेसने कितीही मोदींच्या विरोधात विखारी प्रचार केला तरी लोकांचे विचार बदलणार नाहीत आणि याची प्रचिती प्रियांका गांधी यांनी 23 मे रोजी येईल असा विश्वासही अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला.