रेल्वेच्या माध्यमातून 8 लाख 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
शिर्डी – देशाचे अर्थकारण बळकट करण्यासाठी शेतमाल निर्यातीचे धोरण राबविण्याची गरज आहे. त्यासाठी 7 लाख कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून एक कल्स्टर तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबर काही शेतमाल कमी वेळेत चांगल्या बाजारपेठेत जाण्यासाठी देशातील पहिला प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात एअर करगो शेती माल निर्यात सेवा राबविण्याचा मानस असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी शिर्डीत दिली.
शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर प्रभू पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिर्डी विमानतळ हे कोल्हापूर-शिर्डी-तिरुपती अशी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेच्या माध्यमातून 8 लाख 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले होते आणि आता त्यापेक्षाही जास्त करण्याचे चिन्ह आहेत. शेतमाल निर्यात करण्यावर भर देण्यात येणार आहे. काही शेतमाल हा कमी वेळेत चांगल्या बाजारपेठेत जावा, यासाठी देशातील प्रयोग राबविण्यात येणार असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअर कारगो शेतमाल निर्यात सेवा राबविली जाणार आहे. यासाठी कारगो टर्मिनलही तयार करण्यात येणार आहे.
याला जोडून लॉजिस्टीक व्यवसाय जोडला जाणार आहे. हे येणाऱ्या दिवसात होईल. देशाच्या इतिहासात 2 लाख 70 हजार कोटी वस्तूची निर्यात झाली तर 3 लाख कोटी ही सेवा क्षेत्राची निर्यात झाली. हा विक्रम याच वर्षी झाला. जागतिक आव्हाने असतांना इतकी निर्यात झाली. या अगोदर व्यापार वाढला की तुट कमी होत होती. आता ही चीन बरोबर ही तूट जवळपास 70 कोटींनी कमी झाली. याचाच अर्थ जवळपास 32 टक्के निर्यात वाढली आहे. देशाच्या नव्या विकासाची वाटचाल सुरु केली पाहिजे. त्यासाठी साईबाबा ताकत देतील, असा विश्वास सुरेश प्रभू यांनी व्यक्त आहे. देशातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेती व ग्रामीण अर्थकारण सुधारणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.